'मी' पणा चा त्याग करणं ज्याला जमेल तो सर्वोत्तम माणूस असेल!

मी एका गोष्टीचा विचार करतो की, देवळाचे दरवाजे लहान का असतात ? तर माझ्या मते माणूस खूप बुद्धिमान, सहजासहजी कोणासमोर झुकणारा आहे. स्वत्व, ‘मी  पणा त्याच्यात भरलेला आहे. बुध्दिमान असल्याने निसर्गावर हा सतत मात करत राहणार. त्यामुळे 'माझ्यामुळे हे सर्व घडतंय' आणि 'माझ्यासाठी हे सगळे आहे' असा एक अहंभाव माणसात राहणार आहे. पण नम्रता जर माणसात नसेल तर त्याच्या या कर्तृत्वाला काहीच किंमत नाही. स्वभावात नम्रता येण्यासाठी शरीर कोणासमोर तरी झुकलं पाहिजे. यासाठी देवळाचे दरवाजे लहान असावेत. जेणेकरून देवासमोर येताना तरी ताठ माथा थोडासा झुकवून, कमरेत बाकून तो आत येईल आणि सर्वशक्तिमान अशा त्या शक्तीसमोर नम्र होईल.

एखादा माणूस सर्वगुणसंपन्न असेल पण त्याच्यात नम्रता नसेल तर त्या गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाला अपुरेपण येईल असे मला वाटतं. आज जर आपण सभोवार पाहिलं तर शिक्षण, सत्ता, पैसा, बुद्धिमत्ता या कशाचा ना कशाचा 'अहं' बहुतेकांमध्ये आढळून येतो. अभिमान असावा पण दुरभिमान असू नये. तुमच्या अभिमानाचा त्रास इतरांना होऊ नये. तुम्हाला ईश्वरानं ज्या या शक्ती दिलेल्या आहेत त्यांचा उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी कसा करता येईल? समाजातील दु:खितांसाठी, अडल्या-नडल्यांसाठी काय करता येईल? याचा मनापासून विचार होण महत्त्वाचं वाटते. आणि जो असा विचार करतो त्याच्याकडे नम्रता आपोआपच येईल. ‘अहं' नष्ट होईल. यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते तुम्हाला मनापासून, अंत:करणापासून दुसऱ्यांसाठी कणव, प्रेम, माया वाटली पाहिजे. माणूस एक विसरतो की सत्ता असो वा पैसा, या गोष्टी कायमस्वरूपी राहणाऱ्या नाहीत. सत्ता आणि लक्ष्मी या खूप चंचल आहेत. तुम्हाला मान मिळतो तो पैसा आणि सत्ता यांमुळे. पण तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल आदर असेल, ममत्व असेल तर तुम्ही कोणत्याही अवस्थेत असलात तरी लोकांना तुमच्याप्रती आपलेपणा वाटतो. ते तुम्हाला मान-सन्मान देतात.

 हो! पण कधी कधी नम्रतेच्या नावाखाली खूप लोक लाचारीनं वागतात. लाचारी म्हणजे नम्रता नव्हे. अर्थात गरिबी माणसाला लाचार बनवते. नाइलाजानं त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी, रोजच्या जगण्याचा लढा लढण्यासाठी लाचारी पत्करावी लागते. शक्तिमान माणसं दुर्बळांना लाचार बनवतात. हा दोष त्या शक्तिमानांचा असतो. पण खूप ठिकाणी आपण पाहतो की, आत्यंतिक स्वार्थापोटी, जास्त मिळवण्याच्या हव्यासापोटी, सत्ता-संपत्तीच्या लोभापायी माणसं नम्रतेचा बुरखा घालून लाचार बनतात. अशा वेळी स्वाभिमान त्यांनी गुंडाळून ठेवलेला असतो. लोभापायी लाचार झालेली माणसं समाजाचं कल्याण करू शकतील का? याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. स्वार्थीपोटी कुणाकुणाच्या, त्यांची लायकी नसताही, पाया पडताना आपण अनेकांना बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. अर्थात पाया पडणं  ही आपली संस्कृती आहे. ज्येष्ठ, बुद्धिमान, गुरूजन, आई-वडील यांना नमस्कार केला पाहिजे. वारकरी संप्रदायात तर समोरच्या माणसातल्या देवत्वाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. एक वारकरी दुस-या वारकऱ्यांच्या पाया पडतो ते समोरच्या माणसातही देव आहे या भावनेनं. तिथं उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. पण मला अमुक अमुक मिळू दे, या हव्यासापोटी पाया पडणं ही संस्कृती नव्हे तर विकृती आहे.

मला असंही वाटतं की जिथं श्रद्धा आहे तिथं नम्रता येते. मग ही श्रद्धा माणसाच्या गुणावर, स्वभावावर, त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वावर असल्यानं त्या माणसासमोर आपण नम्र  होतो. मोठमोठे कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ यांची जीवनचरित्रं पाहिली तर त्यांच्या स्वभावगुणात नम्रतेला खूप मोठं स्थान आढळतं.

एखाद्या गायकाची मैफल रंगली आणि रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली तर तो गायक हात जोडून प्रेक्षकांसमोर नतमस्तक होतो. नाटकातला ज्येष्ठ/श्रेष्ठ  कलावंत रंगमंचावर माथा टेकून नम्र होतो. अभिजात नृत्य सादर करताना नृत्यांगना नटराजासमोर सर्वस्वाने नम्र होते. शास्त्रज्ञाचा एखादा शोध जगन्मान्य झाला तर तो स्वत:च्या शास्त्रापुढे नतमस्तक होऊन परमेश्वराचे आभार मानतो. मला वाटतं ही खरी नम्रता.

तुम्हाला भरभरून परमेश्वरानं, निसर्गानं, लोकांनी खूप काही दिले तरी त्याबद्दल गर्व वाटू देता नम्रतेनं या गोष्टी स्वीकारण्याचं मनाचं मोठेपण असणं महत्वाचं  आहे. नम्रतेसाठी माझ्यातल्यामीपणा चा त्याग करणं ज्याला जमेल तो सर्वोत्तम माणूस असेल. पण हे होईल का? प्रयत्न करायला काय हरकत आहे,नाही का?

आपला नम्र,